वऱ्हाडवृत्त (डिजिटल)
नागपूर : महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नये. त्यांनी या योजनेचे कौतुक करावे. उलट मविआचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतून महिलांना दोन हजार रुपये देऊ असे सांगा म्हणत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. नागपुरात “संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ” सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मविआला विधानसभा निवडणूक विजयी होण्यासाठी काही सल्ले दिले आहेत.
नागपुरातील सभेत बोलताना श्याम मानव म्हणाले की, महिलांच्या नावावर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकार महिन्याला दीड हजार रुपये पाठवत आहे. ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. या दीड हजार रुपयांमध्ये स्त्रियांची क्रयशक्ती वाढली आहे. यामुळे आता त्या कुटुंबावर पैसे खर्च करतील, त्यामुळे छोटे उद्योग व्यवसायांना चालना मिळेल. आपण या योजनेचे समर्थनच केले पाहिजे. त्यामुळे मविआने महिलांना समजावून सांगावे की, ही योजना चांगली आहे. पण पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले तर तुम्हाला दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये मिळतील. पण पहिले तुम्ही महायुतीतील उद्दाम भावांना राज्यातून हाकला, असा सल्ला श्याम मानव यांनी मविआला दिला आहे.
तर, याबाबत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांशी चर्चा झाली आहे, असे सांगत श्याम मानव म्हणाले की, राहुल गांधींसह केंद्रातील अनेक मोठ्या काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली आहे. या सर्व नेत्यांशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगत आहे की महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणा. कारण, मला खात्री आहे की महाविकास आघाडी संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच, निवडणूक जाहीर झालेली असताना आचारसंहिता लागलेली असताना भाजयुमोचे कार्यकर्ते उघडरित्या विचार मांडण्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणत आहेत. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आपल्या अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यांवर गदा येईल, असा इशारा ही श्याम मानव यांनी यावेळी दिला.