श्री संत गुलाबराव महाराजांचा जीवनपट विलक्षण आहे. त्यांचा जन्म ६ जुलै १८८१ साली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर (ता. लोणी) येथे झाला. गुलाबराव महाराज हे महाराष्ट्रातील एक मोठे संत, कवी व मराठी लेखक सुद्धा होते. सूत्रग्रंथ, भाष्य प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण व कोश लिहिणारे विसाव्या शतकातील एक असामान्य व अलौकिक संत होते.
त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. ग्रामीण भागात ३४ वर्षे वास्तव्य करून सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १३४ ग्रंथ लिहिले. गुलाबराव महाराजांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. भगवद्रदेह अनध्यस्थ, विवर्त आहे म्हणजेच ज्ञानानंतर नाश पावत नाही. हा भक्तिसिद्धांत शांक्यतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. वयाच्या आठव्या महिन्यातच आंधळेपणा आलेला. अशा स्थितीत महाराजांनी सर्व ज्ञान कसे प्राप्त केले, हा प्रश्न सामान्य माणसाला निश्चित पडतो. इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरचे, धर्म आणि अध्यात्म शास्त्र, संस्कृतातील गायनशास्त्रावरचे, वैद्यक शास्त्रावरचे, विविध कला विषयांचे, वेद- उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी १२ ते १६ वर्षांच्या काळातच केले. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर उत्तरेकडचे व बंगालकडचेही जे मोठे विद्वान त्यांच्या संपर्कात आले ते सर्व त्यांची अलौकिक प्रतिभा पाहून थक्क झाले.
मानभाव मत, डार्विन मत, स्पेन्सर, मायर्स यांच्या मतांवर आणि ग्रंथांवर महाराजांनी समीक्षा केली. जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा केली. विविध विषयांवरच्या १३४ ग्रंथांचे लेखन महाराजांनी केले. मराठी, हिंदी, ब्रज, संस्कृत भाषेत लेखन केले. काव्य, योग, संगीत, धर्म, सांख्यशास्त्र, वेदान्त, छंदशास्त्र असे सर्व विषय हाताळले. हे अगाध ज्ञान महाराजांनी केव्हा व कसे प्राप्त केले असेल हा विषय आजही आपल्या विचारक्षमतेच्या बाहेरचाच आहे.
महाराज जवळच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत असत. अगाध स्मरणशक्तीच्या आधारे एकदा ऐकताच त्यांच्या स्मरणात राहात असे. त्यांच्यासाठी पुस्तक वाचणारा कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. प्रत्येकाला दक्षिणा द्यायचे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कशाचा मोह बाळगला असेल तर तो केवळ ज्ञानलालसेचा, अर्थातच ग्रंथांचा आणि पुस्तकांचा. पत्नीचे एक लुगडे व स्वतःच्या अंगावर बंडी आणि धोतर या शिवाय महाराजांजवळ कुठलीच संपत्ती नव्हती. जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. गुलाबराव महाराजांनी दोन हजारहून अधिक ग्रंथ जवळ बाळगले. पुस्तकांच्या पेट्या डोक्यावर घेऊन कितीही मैलांचा प्रवास ते पती-पत्नी करीत. ती दुर्मीळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत सुरक्षित आहे. या ग्रंथसंपदेवर महाराजांचा जीव होता. ‘ज्ञानेश्वरी- गूढार्थदीपिका’ ग्रंथाचे कर्ते वेदान्तकेसरी बाबाजी महाराज पंडित या आपल्या शिष्योत्तमावर महाराजांचे प्रचंड प्रेम होते. बाबाजी महाराजांची गुरुभक्ती निः सीम होती. ग्रंथालयाची व्यवस्था चांगली ठेवावी, ही सूचना बाबाजी महाराजांना त्यांनी केली होती. परिणामी महाराजांचा हा धनसंग्रह आजही सुरक्षितपणे जपून ठेवला आहे.
अंध असलेल्या गुलाबराव महाराजांनी अकोल्याच्या एका चित्रकाराकरवी ज्ञानेश्वर माउलीचे एक चित्र तयार करून घेतले होते. याच चित्राच्या आधारे नंतर ज्ञानेश्वर माउलींचे फेट्यातील समाधिस्थ बसलेले चित्र विविध चित्रकारांनी साकारले. ते चित्र आजही या ज्ञानेश्वर मंदिरात अग्रभागी लावण्यात आले आहे. गुलाबराव महाराजांच्या ग्रंथ संपदेत आज अत्यंत दुर्मीळ असलेल्या ग्रंथांचाही समावेश आहे. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी गुलाबराव महाराजांचे जीवन प्रेरणादायी आहे. बाबाजी महाराज पंडितांच्या नंतर त्यांचे चिरंजीव पदनामकोष किंवा घटनेच्या मराठी अनुवाद निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा होता, असे डॉ. वा. ना. पंडित आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव – गुलाबराव महाराजांच्या साहित्याचे, सोबतच उर्दू साहित्य व प्रामुख्याने गजलचे अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी महाराजांचे वैचारिक धन जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. डॉ. राम पंडित यांनी पुढाकार घेऊन स्कंददास स्मारक न्यास व पंचलतिका ग्रंथ न्यास या प्रकाशन संस्था स्थापन केल्या आणि सातत्याने गुलाबराव महाराजांचे ग्रंथ प्रकाशित केले. प्राचीन काळात भारतात सगळेच शास्त्र विकसित होते. त्यासाठी संस्कृतचे अध्ययन आणि आकलन आवश्यक आहे. ते आकलन महाराजांना झालेले होते. त्यातूनच त्यांनी जगाला थक्क करून सोडणारा विचार मांडला…
शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी ग्रंथनिर्मिती केली. आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता, गती, प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान, योग, मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन – स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. गुलाबराव स्वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. कृष्णपत्नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित यांनी १९६४ पर्यंत चालविला. असा हा थोर व विद्वान संत गुलाबराव महाराज हे २० सप्टेंबर १९१५ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी वैकुंठवासी झाले.
ह. भ. प. श्याम नारायणदास