अमरावती : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले.
नरहरी झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहआयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते.
नरहरी झिरवाळ म्हणाले, अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लवकरच मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाची तपासणी करण्यास गती येईल. अन्न प्रशासन विभागाने अन्न परवाना आणि नोंदणीची तपासणी करावी. औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा वेळोवेळी तपासावा. त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात.
दुधाच्या गुणवत्तेचे निकष ठरविण्यासाठी पशुपालकांकडील दुधाचे नमुने तपासण्यात यावे. पशुपालक ते दुधाची विक्री या साखळीमध्ये भेसळ होत असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. जनावरांच्या चाऱ्यातील विविधता तपासावी. चाऱ्यामुळे दुधातील स्निग्धतेच्या प्रमाणात फरक पडत असल्यास उत्कृष्ट चाऱ्याच्या लागवडीवर भर देण्यात यावा. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी. अन्न सुरक्षेसाठी अंगणवाडी सेविका, तसेच शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फोस्टॅक या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.
