मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत सामान्य नागरिक, शेतकरी, शिक्षक, न्यायिक कर्मचारी, दिव्यांग कल्याण, स्थानिक स्वराज्य संस्था अशा अनेक क्षेत्रांना दिलासा देणारे १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः शेतीच्या वाटणीसाठी फक्त ५०० रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यापुढे शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी दस्तावर रेडीरेकनरच्या १ टक्के प्रमाणे आकारली जाणारी फी रद्द करण्यात आली असून केवळ ५०० रुपयांमध्ये ही वाटणी होणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे

