११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र समृद्धी मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मागोवा घेणारा लेख…
देशाचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातून अनेक वेळा अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत, तर येथील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, असे सांगतात. हे सत्य स्वीकारुनच गेल्या ८ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातील पायाभूत सुविधांवर भर देऊन देशभरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे देशात औद्योगिक व कृषीक्रांतीचे वारे वाहू लागले आहेत. आज देशातील रस्त्यांना रक्तवाहिन्यांचे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतमाला योजनेंतर्गत आज देशात ४४ आर्थिक कॉरिडॉर विकसित केले जात आहेत.
सात लाख हजार कोटींच्या भारतमाला योजनेंतर्गतच्या या प्रकल्पांपैकी मुंबई – कोलकाता (१८५४ किमी. ) मुंबई – आग्रा (९८६ किमी.) व सुरत-नागपूर (५९३ किमी.) हे तीन आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्रात असून, याचा फायदा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला होणार आहे. भारतमाला योजनेंतर्गत १४ आंतर कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार असून, देशातील ३५ शहरांतून लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश आहे. याशिवाय पायाभूत सुविधामधील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा तर आर्थिक विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे बांधून देशासमोर महामार्ग बांधणीचा एक नवा आदर्श निर्माण केला. पुढे अटलजींच्या काळातही महामार्ग बांधणीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. २०१४ नंतर
मोदी सरकारने तर महामार्ग निर्मितीचा जगात विक्रम केला आहे. आज जगात सर्वाधिक लांबीचे महामार्ग निर्माण करणारा भारत एकमेव देश ठरला आहे.
२०१४ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. अत्यंत कल्पक व सातत्याने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण अभ्यासू व धाडसी मुख्यमंत्री लाभला. महाराष्ट्राच्या विकासासाठी
औद्योगिक विकासाबरोबर शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. महाराष्ट्राच्या अविकसित भागाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला अत्यंत व्हिजनरी व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ होय. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली. नागपूर-मुंबई
एकूण ७०१ किमी लांबीच्या या मार्गाचा फायदा महाराष्ट्रातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना होणार असून, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्यांबरोबर १४ जिल्हे इंटरचेंजेस माध्यमातून जोडले जाणार आहेत. यातील वर्धा व जालना येथे भव्य ड्रायपोर्ट उभारले जात आहेत. त्यामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे.
७०१ किमी. लांबीच्या या महामार्गाची रुंदी १२० मीटर असून, त्यावर ७०० अंडरपासेस, ६५ उड्डाणपूल, २९४ लहान पूल, ८ रेल्वे ब्रीज आणि ३२ वेसाईड अॅमिनिटीज सेंटर असणार आहेत. ७०१ किमीचे हे अंतर ताशी १५० किमी वेगाने ६ ते ८ तासांत पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग केवळ दळणवळण सुविधेसाठी निर्माण झालेला नसून महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी निर्माण करण्यात आला आहे. या महामार्गावरील प्रवास सुखकर तर असावाच, परंतु सुखदही व्हावा म्हणून महामार्गाचे सौंदर्य वाढवण्यासाठी संपूर्ण महामार्ग शीतल वाटावा म्हणून रस्त्यांच्या दोन्ही बाजूला १२ लाख वृक्ष व फुलझाडांची लागवड केली जात आहे. भारतीय रस्ते परिषदेच्या निकषप्रमाणे प्रती किमी ६०० झाडे लावावी लागतात; परंतु समृद्धी महामार्गावर प्रती किमी १३२६ झाडे लावली जात आहेत. वाटेतील तानसा, काटेपूर्णा, कारंजा या अभयारण्यातील प्राण्यांना कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी तेथे महामार्गाची रुंदी वाढवून मुक्त प्राण्यांची काळजी घेतली आहे. बहुतांश मार्ग ग्रामीण भागातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या गुरा-ढोरांचे नुकसान होऊ नये म्हणून ७०० अंडरपास आणि ओव्हरपासेस निर्माण करण्यात आले आहेत.
या महामार्गासाठी ८३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, एकूण २३५०० शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात बाजारभावाच्या पाचपटप्रमाणे साडेसात हजार कोटी रुपये खरेदी झाल्यापासून एक ते चोवीस तासांच्या आत त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसने रकमा जमा करण्यात आल्या आहेत. भूसंपादनची ही किचकट व अवघड प्रक्रिया अवघ्या आठ महिन्यत पूर्ण करण्यात आली.
या महामार्गावर १८ कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जात असून, याचा फायदा ३९२ गावांना होणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी विविध उद्योग, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असून त्यासाठी कौशल्य विकास केंद्र, आयटीआय, शाळा, कॉलेज, हॉटेल अशा उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच लोणार सरोवर, वेरुळ अंजिठा, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबाद पेंच प्रकल्प यासारख्या पर्यटन व तीर्थक्षेत्री येणाऱ्या पर्यटकांची सोय होणार असून, पर्यटन व्यवसायालाही मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्यांच्या मंत्री काळात आकारास आला ते एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर आहेच; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. दोघेही या महामार्गाकडे महाराष्ट्राचे भविष्य म्हणून पाहात आहेत.
देशभरात ज्यांनी मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण केले, ज्यांच्या हाती संपूर्ण भारताने आपले भविष्य दिले आहे, ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे होत आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास शुभेच्छा!
गणेश हाके
(लेखक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते व पाक्षिक मनोगतचे संपादक आहेत)