मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते, असा दावा केला जातो. राजकीय अभय, वरदहस्त असल्याने कराडने बीडमध्ये गुन्हे केले आणि पचवले असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. वाल्मिक कराड आरोपी असल्याने या प्रकरणी तपास योग्य रीतीने होणार नाही, असेही विरोधकांनी म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता. अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मुंडे यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.’
‘ न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.’, असे ट्विट करत मुंडेंनी राजीनाम्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.