आज, रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला भगवान विष्णू (शालिग्राम) आणि आई तुळशीचा पवित्र विवाह सोहळा होणार आहे. आजपासून सर्व शुभ आणि मंगल हिंदू कार्यांना सुरूवात होते, अशी परंपरा आहे.
तुळशी विवाह केल्याने घरात सुख-शांती, सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी येते, असे मानले जाते. ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत किंवा वैवाहिक आयुष्यात समस्या आहेत, त्यांनी या दिवशी विशेष पूजा, व्रत आणि तुळशी–विष्णू प्रार्थना करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
या दिवशी दान करणे, दिवे लावणे, तुलसी चालीसा पठण करणे आणि तुळशीच्या रोपाची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे कृपाशिर्वाद लाभतात.
द्वादशी तिथी
सुरुवात : २ नोव्हेंबर, सकाळी ७:३३
समाप्ती : ३ नोव्हेंबर, पहाटे २:०७
पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त : ४:५० ते ५:४२
सकाळची संध्या : ५:१६ ते ६:३४
अभिजित मुहूर्त : ११:४२ ते १२:२६
गोधुली मुहूर्त : ५:३५ ते ६:०१
आजचे दोन शुभ योग
त्रिपुष्कर योग : दुपारी १:०० ते रात्री १०:३३
सर्वार्थ सिद्धी योग : रात्री १०:३४ ते पुढील दिवशी पहाटे ५:३४
या दोन्ही योगांमध्ये तुळशी विवाह करणे अत्यंत शुभ मानले जाते.

तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य
भगवान विष्णूची मूर्ती
तुळशीचे रोप
लाल चुनरी
पिवळे वस्त्र किंवा धोतर
अक्षता, सिंदूर, कुंकू, कच्चा दोरा
पंचामृत, मध, गाईचे तूप
ऋतूनुसार सात फळे
फुले
मातीचे दिवे व वात
सोळा श्रृंगार सामग्री
तुळशी विवाह कथा किंवा मंगलाष्टक पुस्तिका
तुळशी विवाह कथा : धार्मिक महत्त्व
पुराणानुसार, जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस समुद्रमंथनातून उत्पन्न झाला. त्याची पत्नी वृंदा अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पवित्रतेमुळे जालंधराला अपार शक्ती प्राप्त झाली आणि देवताही त्याला पराभूत करू शकत नव्हत्या. त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त देवांनी भगवान विष्णूंना सहाय्य मागितले.
देवतांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले आणि वृंदासमोर प्रकट झाले. तिने त्यांना पती समजून सेवा केली. सत्य समजल्यानंतर वृंदाने विष्णूंना शाप दिला : “तू दगड होशील.” त्या शापामुळे विष्णूंनी शालिग्राम रूप धारण केले.
वृंदा सती गेल्यानंतर तिच्या राखेतून उगवलेली पवित्र वनस्पती म्हणजे तुळस. भगवान विष्णूंनी तिला अत्यंत प्रिय घोषित केले आणि सांगितले की तुळशीशिवाय ते नैवेद्य किंवा पूजा स्वीकारणार नाहीत.
यामुळे शालिग्राम (विष्णू) आणि तुळशीचा विवाह दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशीला मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
