गाविलगड हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती घनदाट जंगल आहे. १२ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगडाचा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.
गडाचा इतिहास :-
महाभारतात भीमाने किचक राक्षसाबरोबर लढाई करून त्याचा इथे वध केला व बाजूच्या दरीत फेकून दिले. ‘किचकाची’ दरी म्हणजे ‘किचकदा’. ‘चिखलदरा’ हा किचकदा या शब्दाचा अपभ्रंश आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठे इंग्रज युद्धात या किल्यावर महत्त्वपूर्ण लढाई झाली होती. आर्थर वेलस्लीच्या इंग्रज सैन्याने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. गाविलगडाचे हे वैभवशाली बांधकाम पहाताना सहाजिकच त्याचा इतिहास आपल्या समोर येतो. हा भाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पुर्वी या डोंगरावर गवळी लोकांना मातीचा कोट उभारला होता, अशी वंदता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनिय पराक्रम केला.
गडाचा परिचय :-
या गडाचे मुंबई पासूनचे अंतर साधारण ७६३ कि.मि आहे. एस. टी. महामंडळाच्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमीत सुटतात. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बुर्हाणपूर कडून धारणी हरिसाल, सेमाडोह ते चिखलदरा हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असल्यामुळे हा गाडीरस्ता सुर्यास्त ते सुर्योदय या रात्रीच्या वेळेस बंद करण्यात येतो. या किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. काही तोफा आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो. या किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार मात्र तोही दुर्लक्षित आहे. शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम आपल्याला चकीत करते. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे पहात रहावी अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्यावरुन आपण दरवाजामधून प्रवेश करतो. आतील पहारेकर्यांच्या जागा, घुमट पाहून पुढे चालू लागतो. पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चवथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा आपली वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. असा हा गाविलगड निसर्गाशी झुंझत व इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
साईप्रसाद