छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर आपल्याला त्यांनी मिळवलेलं स्वराज्य आठवतं, मोगलांशी दोन हात करताना त्यांना करावा लागणारा पराक्रमही नजरेसमोर येतो. त्याचवेळी त्यांची तलवारही आठवते. कारण याच तलवारीच्या जोरावर आणि कमी संख्येने असलेल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत. त्यामुळे छत्रपतींचं शस्त्र साहित्य कसे होते याची उत्सुकता सर्वांनाच असते. नांदेड इथल्या शिवलिंग बादशाह मठाचे मठाधीश सिद्धदयाळ शिवाचार्य यांनी मराठा तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेली तलवार कशी होती याची माहिती दिली आहे. तलवारीचे प्रकार कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती ), समशेर (मोगली ),गुर्ज,पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार तलवारीच्या मुठीवरूनच तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात. मुठी तांबे, पोलाद, पितळ, हस्तीदंतापासून तयार केलेल्या असत. यातही किरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ उपप्रकार आहेत. खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार आहेत. तलवार अनेक भागात विभाजली जाते. नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे सुमारे २२ भाग असतात. पाते- तलवारीत पाते हे महत्वाचे असते. पोलाद टोलेडो, चंद्रवट, हत्तीपागी, फारशी, जाव्हारदार प्रकारचे असतात. तलवार हाताळणे, तलवार पकडणे, तलवार म्यानातून बाहेर काढणे, तलवार फक्त पाहण्यासाठी काढलेली असताना तिला पुन्हा म्यान करताना रक्ताचा मान देणे असे महत्वाचे नियम पाळण्यात येत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वत: जातीने या सर्व प्रकारावर नजर ठेऊन असत. प्रत्येक मावळ्याने कशाप्रकारे तलवार चालवली आहे याची माहिती ते घेत. सासवड जवळील सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खंडा तलवार सुमारे ४२ किलोची आहे. अशाप्रकारची भव्य आणि वजनी अशी एकमेव तलवार भारतात आहे. शिवरायांची भवानी तलवार ही स्पॅनिश तोलेदो कंपनी मेड आहे असे सांगण्यात येते. पोर्तुगीज सेनापतीकडून खेमसावंत यांच्याकडे आणि त्यांच्याकडून शिवरायांकडे ही तलवार आली. मुघल सैन्यातील मराठा सरदारही मराठा तलवार वापरत होते. त्यांच्या तलवारी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील तलवारीत फरक होता. मुघल मराठा तलवारीची ठेवण वेगळी असायची जेणेकरून लढाईत सैन्य कुणाचे होते हे ओळखता यायचे. काही तलवारींना रिबिट मारलेले दिसतात. शंभर मुंडकी उडवल्यानंतर तलवारीवर एक रिबीट मारले जायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे तलवारीचे पाते युरोपातून मागवायचे कारण ते पाते लवचिक असायचे. युरोपातून मागवलेल्या पात्यांना शेकडो वर्ष गंज लागत नाही. शेकडो वर्षे झाली तरी तलवारीच्या पातीला गंज लागत नाही. मराठा तलवार मुठीवरून ओळखली जायची. ही तलवार बनवताना मुठीवर विशेष लक्ष दिलं जायचं. स्वत: शिवाजी महाराज यांनी एक तलवार बनवली होती. तिची ठेवण, वजन, मुठ हे महाराजांनी स्वत: ठरवले होते.